भारतातील जर्मनीचे नवीन राजदूत वॉल्टर लिंडनर यांचे मत
नवी दिल्ली – भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळायलाच हवे.या परिषदेतील भारताच्या अनुपस्थितीमुळे या संयुक्त राष्ट्राच्या व्यवस्थेमधील विश्वासार्हतेला बाधा येत आहे, असे भारतातील जर्मनीचे नवीन राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी म्हटले आहे. लिंडनर यांनी आपल्या भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर हिंदीतून मांडल्या आहेत.
राष्ट्रपतींना आपल्या मतांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लिंडनर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “जी-4′ समुहामध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझिलचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्वरुप अधिक व्यापक व्हावे. त्यात भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी “जी-4′ गट प्रयत्नशील आहे. सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळालेच पाहिजे. 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताला अद्याप सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व दिले गेलेले नाही. हे असे चालता कामा नये.
भारताच्या अनुपस्थितीमुळे संयुक्त राष्ट्राच्या या यंत्रणेमध्ये विश्वासार्हतेला बाधा पोहोचते आहे, असे लिंडनर म्हणाले. सध्या चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देशच सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत. जैश ए मोहंम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याला जर्मनीचा पाठिंबाच आहे. दहशतवाद विरोधासंदर्भात जर्मनीकडून भारत आणि अन्य देशांना पाठिंबाच दिला जाईल, असेही ते म्हणाले.