मुंबई – तृणमुल कॉंग्रेसने सध्या कॉंग्रेसच्या विरोधात जी राजकीय भूमिका घेतली आहे त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील स्तंभातून जोरदार टीका केली आहे.
तृणमुल कॉंग्रेसने अन्य राज्यांतील विश्वासघातकी नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देऊन जे राजकारण चालवले आहे ते ममता बॅनर्जी यांना शोभणारे नाही. त्या स्वताच भाजपशी लढत असताना त्यांनी अन्य पक्षांचे असे नुकसान करणे बरोबर नसल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
गोव्यात तृणमुल कॉंग्रेसच्या अस्तित्वामुळे भाजपलाच लाभ होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमुल कॉंग्रेसने तिथे जो आक्रमक प्रचार सुरू केला आहे त्यासाठी वेगळ्याच ठिकाणाहून निधी पुरवला जात असल्याची शंकाहीं यात उपस्थित करण्यात आली आहे.
भाजप व पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसचे अस्तित्वच संपवून टाकण्याच्या उद्देशाने प्रयत्न करणे हे समजू शकते पण ममता बॅनर्जीही त्याच उद्देशाने काम करीत असतील तर ते त्यांच्या प्रतिमेला साजेसे नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाला सहजासहजी गोवा जिंकता येणार नाही, पण आम आदमी पक्ष आणि तृणमुल कॉंग्रेस पक्ष यांनी कॉंग्रेसच्या मार्गात तेथे अडथळे निर्माण केले आहेत त्याचा भाजपला लाभ होऊ शकतो असेही राऊत यांनी म्हटले आहे.