नवी दिल्ली – करोनामुळे मृत्यू पडलेल्यांची संख्या जी दाखवली जाते आहे, ती फार कमी असून प्रत्यक्षात ती संख्या त्यापेक्षा कैकपटीने जास्त असल्याचा दावा केला जातो आहे. काही माध्यमांनीही तसेच वार्तांकन केले आहे. मात्र हे दावे चुकीचे आणि भ्रम निर्माण करणारे असल्याचे नमूद करत सरकारकडून ते फेटाळण्यात आले आहेत.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की देशात मृत्यू नोंदणी केली जाते. ती यंत्रणा पाहता काही आकडे कमी जास्त होउ शकतात. मात्र ज्या प्रमाणात मृत्यूंची नोंदणी झाली नसल्याचा दावा केला जातो आहे, तो चुकीचा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
करोना काळात भारतात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही संख्या मिलियन्सच्या अर्थात दशलक्षाच्या पटीतली असल्याचे दावे काही विदेशी माध्यमांनी केले आहे. तशाच बातम्या देशांतील माध्यमांतूनही प्रसारित झाल्या आहेत. मात्र हे सगळे चुकीचे आणि भ्रम निर्माण करणारे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.