शहरात पोलिसांकडून १०० पेक्षा जास्त वाहने जप्त
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर शहरात लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करीत आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांकडून १०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करीत वाहने जप्त केली. जिल्ह्यात कोव्हीड १९ च्या रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना राजगुरूनगर नगर परिषदने एक पाऊल पुढे टाकून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पोलिसांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राजगुरूनगर शहरामध्ये लॉकडाऊन असतानाही नागरिक याना त्या कारणासाठी रस्त्यावर येत आहेत. गेली आठवडाभर नागरिकांना लॉकडाऊन असताना काहीशी मोकळीक दिली होती मात्र याच नागरिकांनी याचा फायदा उठवत रस्त्यावर गर्दी केली. आज तर त्यांनी कहरच केला कालपासून पुन्हा शहरातील लॉकडाऊन कडक केले मात्र नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी शहरात गर्दी केली. सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने नियम पुन्हा कडक करून शहरात आता पूर्णतः वाहन बंदी करण्यात आली आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड- भोसरी परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या शहाराच्या नजीक असलेल्या राजगुरूनगर शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून खबरदारी घेत शहरातील सर्व रस्ते काल मध्यरात्रीपासून बंद केले आहेत. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी जुना मोटार स्टॅन्ड परिसरात नाका बंदी करून विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या १०० पेक्षा जास्त दुचाकी जप्त केल्या आहेत.
खेड तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही तरीही खबरदारी म्हणून आळंदी चाकण आणि राजगुरूनगर नगर परिषदाच्या माध्यमातून करोना विषाणू रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या तीनही शहरांमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक निर्बंध अवलंबविण्यात येत आहेत.