राजगुरूनगर (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळाकरिता शासनाने घोषित केल्याप्रमाणे मिळणारे धान्य मोफत वाटप केले जाणार असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र अर्ज सादर करण्याचे शासनाचे आदेश नाहीत. येत्या आठ दिवसांत हा साठा उपलब्ध होईल.त्यावेळी मानसी ५ किलो तांदुळ वाटप केले जाणार आहे.याबरोबरच तालुक्यात आळंदी राजगुरूनगर व चाकण येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करून गरिबांना जेवण दिले जाणार आहे. चाकण येथील दोन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत अशी माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
करोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागु आहे. या कालावधीत गोरगरीब, भिक्षुक किंवा तात्पुरत्या वास्तव्या साठी असलेल्या व्यक्ती उपाशीपोटी राहु नयेत म्हणून खेड तालुक्यात शासनाच्या वतीने चार ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. चाकण मध्ये दोन ठिकाणी, आंबेठाण येथे एक आणि राजगुरूनगर शहरात एक अशी ही केंद्र असतील. त्यातील चाकण मधील केंद्र सुरू झाली आहेत.
लॉकडाऊन काळात तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गुरुवारी (दि २) पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी सौ आमले यांनी ही माहिती दिली. आमदार दिलीप मोहिते पाटील, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप, पुरवठा अधिकारी गणेश रोकडे, दीपक मडके यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार सुचित्रा आमले म्हणाल्या की,तालुक्यात चार केंद्रातून शिवभोजन थाळी दिली जाणार आहे.प्रत्येक केंद्रातून १०० याप्रमाणे ४०० पॅक थाळी रोज सकाळी एकदा वितरित केली जाणार आहे.ज्यांना शक्य आहे त्यांनी ५ रुपये शुल्क देऊन घ्यावी.ज्यांची आर्थिक स्थिती नाही त्यांना ती मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
खेड तालुक्यात १८८ स्वस्त धान्य दुकाने आहेत. येथुन एप्रिल महिन्याचे गहु, तांदूळ असे धान्य कार्डधारकांना वितरित करण्यात येत आहे. अंत्योदय कार्ड धारकांमध्ये २८८ शहरी आणि २५२७ ग्रामीण लाभार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यात प्राधान्य गटातील कार्डधारकांची शहरी ८८९५ व ग्रामीण भागातील ४२६१५ एवढी संख्या आहे. शहरी कार्डधारकांची ४१ हजार ४३७ सदस्य तर ग्रामीणची २ लाख,३५ हजार, ८२३ सदस्य संख्या आहे. यातील प्रत्येक कार्ड प्रमाणे मानसी ३ किलो गहु आणि २ किलो तांदुळ वितरित केले जाणार आहे.
सध्या वाटप करण्यात येत असलेल्या गहु, तांदळाचे नेहमीप्रमाणे पैसे देणे कार्ड धारकांना बंधनकारक आहे. मात्र लॉकडाऊन काळाकरिता शासनाने घोषित केल्याप्रमाणे मिळणारे धान्य मोफत वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र अर्ज सादर करण्याचे शासनाचे आदेश नाहीत.येत्या आठ दिवसांत हा साठा उपलब्ध होईल.त्यावेळी मानसी ५ किलो तांदुळ वाटप केले जाणार आहे.शहरात नगरपरिषद घरपोच वाटप करणार आहे. तर ग्रामीण भागात गर्दी न करता दुकानदारांनी वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांचे स्वस्त धान्य कार्ड तालुक्यात नाहीत व ते येथे वास्तव्यास आहेत. आशा लोकांना आधार लिकिंग द्वारे नजीकच्या दुकानात धान्य देण्यात येईल. ज्यांच्याकडे कार्ड नाही अशा लोकांना सहकार्य करण्याच्या हेतूने स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी योगदान दिले आहे. त्याद्वारे या नागरिकांना दोन वेळचे जेवण,जीवनावश्यक वस्तू मोफत देण्यात येतील.त्यांनी स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामसेवक अथवा तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सौ आमले यांनी केले आहे.