नांदेड : शिख भाविकांची दक्षिण काशी असणाऱ्या नांदेड येथील सचखंड हुजुर साहिब गुरुद्वारादेखील करोनाच्या संकटाशी दोन हात करत असून आतापर्यंत लाखो नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे. येथील गुरुद्वारात वर्षाचे बाराही महिने अन्नदान केले जाते. मात्र, करोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीतही भुकेल्यांना घरपोच अन्नदानाचा संकल्प गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आला आहे. बोर्डाच्या या दातृत्त्वाबद्दल सर्व स्तरांतून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. या लंगर सेवेचा दररोज साडेतीन ते चार लाख जण लाभ घेत आहेत.
गुरुद्वारा लंगर साहिब कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यानंतर सर्वतोपरी मदतीला धावून नांदेडकरांची सेवा करत आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या संकटातून देश सहीसलामत बाहेर पडावा व जनतेचे कल्याण व्हावे, यासाठी लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सहा अखंड पाठ करण्यात आले. लंगर साहिब गुरुद्वाराच्या महाराष्ट्र राज्यात नांदेडसह मनमाड, शहापूर, चांदवड, देगलूर, कारेगाव, लोहा येथील संस्थानामार्फत अन्नदान करण्यात येत आहे. दररोज सरासरी साडेतीन ते चार लाख नागरिकांना ही सेवा उपलब्ध केली जात आहे.
नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात देशात कारसेवा सुरू असून या सेवेच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये ही या राष्ट्रीय आपत्ती दरम्यान लंगरची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यांच्या या कार्याबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या मानवतावादी कार्याचे कौतूक केले आहे. लंगर सेवेसाठी गुरुद्वारा बोर्डाचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात असून पहाटे चार वाजेपासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरू होत असून रात्री उशिरापर्यंत लंगर वाटप करण्यात येत आहे.