गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आले.
निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही.लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळालं नाही त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही असे प्रतीपादन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली ,कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकुणच हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब जनतेवर याचा पर्यायाने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे ! त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत ब्रम्हपुरी नंतर आज सावली आणि सिंदेवाहीत रविवारी प्रती कुटूंब 10 किलो तांदूळ, 2 किलो तूर डाळ, 1 किलो खाद्य तेल, 200 ग्राम मिरची पावडर, 50 ग्राम हळद पावडर, 1 किलो मीठ, 1 साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम 144 चे पालन करण्यात आले.