जिल्ह्यात दररोज 1500 शिवभोजन थाळी योजनेचा लाभ
बीड : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांसाठी तसेच निराश्रित, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. दि. 14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार बीड शहरातील 7 शिवभोजन केंद्रामधून दररोज 700 व जिल्ह्यातील 10 शिवभोजन केंद्रातून दररोज 800 शिवभोजन थाळी योजनेचा लाभ देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी दिली आहे.
राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी होय. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे.
परजिल्ह्यातील बीड जिल्ह्यात अडकून पडलेले नागरिक, तसेच, संचारबंदीत हाताला काम नसलेल्या गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहेत. तसेच, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
बीड शहरात नागनाथ बहुउद्देशीय, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल समाधान येथे शिवभोजन केंद्र चालवण्यात येत आहे. येथे दररोज शिवभोजन योजनेतून 150 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तसेच, स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून बीड बस स्टँड समोरील जयदुर्गा हॉटेल येथील शिवभोजन केंद्रात दररोज शिवभोजन योजनेतून 125 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. अमित सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून न्यू माऊली पावभाजी सेंटर, बीड येथे शिवभोजन योजनेतून 125 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तर नवीन भाजी मंडई, बीड येथील हॉटेल सौरभ येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे.
जयगुरु गणेश मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, बीड येथील पाबळे हॉटेलमध्ये दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. बीड जिल्हा शासकीय रुग्णालय व एस. पी. ऑफीस समोरील हॉटेल यशराज येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. माऊली महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, नवीन मोंढा, बीड येथील हॉटेल माऊली येथे शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे.
शिवभोजन केंद्र चालक विनायक शिंदे म्हणाले, कोरोनामुळे अडकलेल्या लोकांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज आम्ही जेवण उपलब्ध करून देत आहोत, त्यासाठी नाममात्र 5 रुपये दर आकारला जात आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.
निरंजन गोसावी म्हणाले, मी मूळचा पुण्याचा आहे. मी गेले 2 महिने बीडमध्ये अडकलो आहे. माझी जेवणाची गैरसोय होत होती. मात्र, शिवभोजन केंद्रामुळे मला जेवण मिळत आहे. कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेचे जेवण मला मिळत आहे.
सिद्धेश्वर आहेरकर, शाहूनगर हे मजुरी व गॅस वेल्डिंगचे काम करतात. ते म्हणाले, कोरोनामुळे सध्या काम बंद आहे. माझ्यावर 4 ते 5 जणांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र काम बंद असल्याने जेवणाचे हाल होत होते. शिवभोजन केंद्रातून स्वस्त आणि चांगले जेवण उपलब्ध होत आहे. यामुळे आमची उपासमार टळली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात ही योजना राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात 10 ठिकाणी शिवभोजन केंद्रे चालवली जात आहेत. यामध्ये हॉटेल ज्ञानेश्वरी, मार्केट यार्ड गेट नं. 2, कडा ता. आष्टी येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तर आष्टीमध्येच बसस्टॅण्ड जवळील यशोदीप भोजनालय येथे शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. हॉटेल नवनाथ, खर्डा चौक पाटोदा, येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तसेच, हॉटेल जयभवानी, बाजारतळ, शिरुर कासार ता. शिरुर (कासार) येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. याबरोबरच हॉटेल जय मल्हार, बाजार पेठ चिंचवण रोड, वडवणी येथे शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तर माजलगाव येथील बस स्टँड जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे दररोज शिवभोजन योजनेतून 100 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. गेवराई बसस्टॅण्ड समोरील प्रताप भोजनालय येथे दररोज शिवभोजन योजनेतून 100 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. धारूर बस स्थानकासमोरील हॉटेल रेणुका येथे दररोज शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. केज येथील भवानी चौक, धारूर रोड येथील हॉटेल संजू बाबा आणि शिवाजी चौक मधील हॉटेल येडेश्वरी येथे दररोज प्रत्येकी शिवभोजन योजनेतून 75 थाळीचा लाभ देण्यात येत आहे. तर परळी व अंबाजोगाई तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
एकूणच कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये शिवभोजन थाळी योजना बीड जिल्ह्यातील गरजूंना दिलासा देणारी ठरत आहे.
शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये करण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. संचारबंदीच्या काळात सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यावश्यक झाल्याने आता या शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलले असून अपवाद वगळता आता फूड पॅकेट स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे.
बीड शहर व जिल्हयामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन खाडे आणि विशेष पुरवठा अधिकारी बाळासाहेब जाधवर यांच्यासह पुरवठा विभागाची टीम ही योजना राबविण्यासाठी कार्यरत आहे.