नवी दिल्ली, दि.15- गेल्या आठवड्यात किरकोळ किमतीवरील महागाई वाढली असल्याची माहिती सरकारने दिली होती. आता घाऊक किमतीवर आधारित महागाई वाढून 27 महिन्याच्या उच्चांकावर गेली असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 4.17 टक्के इतका नोंदला गेला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विजेचे दर वाढल्यामुळे या महागाईच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यात या महागाईच दर केवळ 2.03 टक्के होता.
बरेच दिवस अन्नधान्याच्या किमती कमी होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये अन्नधान्याच्या किमती 1.36 टक्क्यांनी वाढल्यामुळे त्याचा एकूण महागाईच्या आकडेवारीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. अन्नधान्यात भाजीपाला, डाळी अधिक महाग झाल्या आहेत. आता डिझेलचे दर उच्च पातळीवर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार असल्यामुळे आगामी काळामध्ये महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तसे झाले तर रिझर्व्ह बॅंक आगामी पतधोरणात व्याजदरात वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकते. ईक्रा या संस्थेच्या आर्थिक विश्लेषक आदिती नायर यांनी सांगितले की, इंधनाचे दर वाढत असल्यामुळे इतर वस्तूच्या घाऊक किमती वाढत आहेत.
ही महागाई पुढील तीन महिने आणखी वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले होते. आता एप्रिल महिन्यातील बैठकीत रिझर्व्ह बॅंक व्याजदराबाबत काय भूमिका घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.