कोलकाता – प. बंगाल विधानसभेची निवडणूक जशी जवळ येते आहे, तसे राज्यातील वातावरण अधिकच तापत चालले आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला पराभूत करण्याच्या इर्षेने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीने आता राष्ट्रपुरूषांच्या नावाचाही वापर करण्यास सुरूवात केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा भारतीय जनता पार्टीने केली आहे. येत्या 23 जानेवारी रोजी नेताजींची जयंती आहे. त्यानिमित्त 23 तारखेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा दौरा करणार असल्याचे बोलले जाते आहे. केंद्र सरकारने तर यासंदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अदम्य भावना, नि:स्वार्थ राष्ट्रसेवा, त्याग यांचे स्मरण करत त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि विशेषत: युवकांना प्रेरीत करण्यासाठी आता दरवर्षी त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेताजींची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी सरकारने एका उच्चस्तरीय समितीचीही स्थापना केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल पोलीस आणि एसपीजीच्या अधिकाऱ्यांचीही एक बैठक 18 जानेवारी रोजी झाली. पंतप्रधानांच्या या बंगाल दौऱ्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश नेतेही त्यांच्यासमवेत असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा हा दौरा भाजपचे आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने विचार केल्यास एक शक्तीप्रदर्शनच ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपच्या या हालचालींच्या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉंग्रेस पक्षही सक्रिय झाला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी त्यांच्या कार्यकर्त्यांसह 23 जानेवारी रोजी पदयात्रा काढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पराक्रम दिवस साजरा केला जाण्याच्या संदर्भात नेताजींचे वंशज आणि भाजपचे नेते सी. के. बोस म्हणाले की हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याऐवजी देशप्रेम दिवस म्हणून साजरा केला गेला असता तर अधिक चांगले झाले असते. तरीही भारत सरकारने जी घोषणा केली आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे.