कोलकता – पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसशी कुठला समझोता करण्यास डाव्या पक्षांनी नकार दर्शवला आहे. तृणमूल सरकारविरोधात तीव्र जनभावना असल्याचा दावाही त्या पक्षांनी केला आहे.
डाव्या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या माकपच्या बंगाल समितीची सोमवारी येथे बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी डाव्या आघाडीची भूमिका मांडली. भाजपचा पराभव हे डाव्या पक्षांचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राजदसारख्या पक्षांशी आम्ही हातमिळवणी करणार आहोत. मात्र, भाजपविरोधी आघाडीत आम्हाला तृणमूल नकोय.
बंगालमध्ये तृणमूल सरकारविरोधात लाट आहे. त्यामुळे तृणमूलला बरोबर घेतल्यास मतदार आमच्यापासून दुरावतील आणि भाजपलाच लाग होईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. तृणमूल आणि भाजपला पर्याय म्हणून आम्ही बंगालमधील निवडणुकीला सामोरे जाऊ.
त्यासाठी रोजगार, अन्न, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर आम्ही भर देणार आहोत. त्या मुद्द्यांवर तृणमूल आणि भाजपकडे कुठलाच तोडगा नाही, असेही येचुरी यांनी म्हटले. बंगालमधील निवडणूक चालू वर्षी एप्रिल-मेमध्ये अपेक्षित आहे.