वाई – वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या हळदीच्या लिलावाचा शुभारंभ जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते, सभापती लक्ष्मण पिसाळ, उपसभापती दीपक बाबर, हळद व्यापारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला. हळदीच्या पहिल्या उकलाला पंधरा हजार रुपये उच्चांकी दराची बोली व्यापाऱ्यांनी केली.
वाई बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या व व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हळदीचा लिलाव 12 फेब्रुवारीला करण्याचे ठरवण्यात आले होते. तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी हळद स्वच्छ करून, चांगल्या प्रतीमध्ये, 50 किलोच्या पिशव्यांमध्ये पॅक करून बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणायचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार बावधन, ओझर्डे, शहाबाग, कडेगाव, व्याजवाडी, खानापूर, भुईंज, कवठे, बोपेगाव, पांडे, सुरूर या परिसरातील उत्पादकांनी आपली हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी आणले. लिलाव प्रक्रियेस सुरवात होणार असल्याने सकाळपासून सातशे क्विंटल हळदीची आवक झाली. लिलाव सुरू झाल्यावर स्वच्छ, निवडून, चाळण लावून आणलेल्या हळदीच्या उच्च प्रतीच्या मालाला पंधरा हजार रुपये दराने व्यापाऱ्यांनी बोली लावली.
त्यामुळे बळीराजा थोडा खूश झाल्याचे दिसत होते. पंधरा हजारांपासून सुरू झालेली बोली मालाच्या प्रतीनुसार बारा हजार, अकरा हजार, दहा हजार, आठ हजारापर्यंत अंतिम बोली लागल्या. हळद चाळून, निवडून विक्रीसाठी आणल्यास दरवर्षीच्या तुलनेत यंदा उच्चांकी दर मिळून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असल्याचे लक्ष्मणराव पिसाळ यांनी सांगितले.
याप्रसंगी संचालक मोहन जाधव, राजेंद्र सोनावणे, विजयकुमार मांढरे, विक्रमसिंह पिसाळ, कुमार जगताप, दत्तात्रय पोळ, अंकुश कुंभार, दत्तात्रय भणगे, प्रकाश साळुंखे, हणमंत चव्हाण, हरुणभाई बागवान,गणेश बनसोडे, नामदेव हिरवे, महादेव मसकर, रमेश गायकवाड, शिवाजीराव पिसाळ, मनीष भंडारी, अरविंद कुदळे, राजेंद्र कदम, सहसचिव प्रताप शिंदे, चेतन पिसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन पाटील यांचा वाढदिवस बाजार समितीच्यावतीने सभापती व संचालकांनी, व्यापारी संघटनेच्यावतीने प्रवीण ओसवाल यांनी आणि हमाल व शेतकऱ्यांनी साजरा केला
हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद स्वच्छ करून, वाळवून बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा. बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांची वजनात व आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने बाहेर माल विकू नये. नवीन हळदीच्या विक्रीसाठी ग्रेडिंग करून मार्केटमध्ये माल आणावा. नियमित लिलाव काढून शेतकऱ्यांना वेळेत बिल अदा करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिसाळ यांनी केले आहे.