वाघोली – मागील चार-पाच दिवसांपासून वारा, पावसाच्या सरींमुळे तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे वाघोली परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे घरूनच काम करणारे नागरिक खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करीत असून महावितरणने याप्रकरणी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
वाघोली सहाय्यक अभियंता कार्यालयाच्या अंतर्गत ७० हजारांच्या जवळपास ग्राहक संख्या असल्याने विजेची मागणी देखील प्रचंड आहे. नवीन कनेक्शन देणे, वीज थकबाकी वसूल करणे, दुरुस्ती करणे अशी अनेक कामे करताना महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर प्रचंड ताण येत आहे. अपुरी कर्मचारी संख्या आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे ग्राहकांना सामोरे जाताना कर्मचारी हैराण होत आहे.
त्यातच मागील चार-पाच दिवसांपासून वारा, पावसांच्या सरींमुळे तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे वाघोली परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. कोरोना परिस्थितीमुळे वर्क फ्रॉम होम अंतर्गत घरून काम करणारे नागरिक खंडित वीजपुरवठ्यामुळे सोशल नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिक तिखट प्रतिक्रिया व्यक्त करून महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करीत आहेत.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र काम करीत आहेत. काही वेळेस दुरुस्तीसाठी अनेकदा जास्तीचा कालावधी लागत आहे. मुख्य वीजपुरवठा मुख्य लाईनवर स्थलांतरित केला असल्याने वीजपुरवठा सुरळीत होत असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.
“लॉक डाऊन ची परिस्थिती असताना घरून ऑफिस चे काम करणाऱ्या नागरिकांना विजेची गरज आहे. या विजेची तातडीने उपलब्धता करून देण्यासाठी महावितरण ने योग्य ती उपाय योजना त्वरित करावी.”
– दादासाहेब सातव पाटील (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजप)