वाघोली (पुणे) – वाघोलीच्या हद्दीमध्ये लोहगाव-भावडी रोडच्या कडेला डोंगराच्या पायथ्याजवळ धारधार शस्त्राने आयटी कंपनीतील तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी वाशिम व परभणी येथून अटक केली आहे. उधारीचे तीन हजार रुपये वेळेत न दिल्याने झालेल्या वादातून तरुणाचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
भगवान सदाशिव केंद्रे व अमोल तुकाराम मानकर (दोघेही सध्या रा. भावडी रोड, वाघोली) असे तरुणाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गौरव सुरेश उदासी (रा. खराडी, मूळगाव अमरावती) या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केलेला भगवान केंद्रे हा पुण्यात ऍप आधारित कॅब चालवत होता. गौरवने ऍपवरून कॅबची दोन वेळा नोंदणी केली होती.
गौरव आणि भगवान यांची यातून ओळख झाली. गौरव हा भगवानला कॅबच्या भाड्याचे तीन हजार रूपये देणे लागत होता. शुक्रवारी रात्री भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवला बोलावून घेतले व वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी नेले. यावेळी उधार दिलेल्या पैशांच्या वादातून गौरवचा गळा चिरून खून करण्यात आला.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथके रवाना केल्यानंतर भगवान केंद्रे याला परभणी येथून पकडण्यात आले तर साथीदार अमोल मानकर याला वाशीम येथून पकडण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी खून करणाऱ्याच्या चोवीस तासांत मुसक्या आवळल्या. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.