कराची – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी भारताला हवा असलेला कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याने आपल्या कुटुंबियांना पाकिस्तानच्या बाहेर पाठवलेलं आहे. भारताकडून पाकिस्तानावर दहशतवादी नेटवर्क विरोधाकडून कारवाई करण्याचा दबाव आणला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने हे पाउल उचलले असल्याचा दावा काही माध्यमांच्या बातम्यांतून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच इम्रान खान सरकारने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जाकी-उर-रहमान लखवीवर कठोर कारवाई केल्याचे चित्र निर्माण केले आहे. यामुळे आता दाऊद घाबरलेला आहे. त्याने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवलेलं आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमने आपल्या कुटुंबियांमध्ये मुलगा, दोन लहान भावांची मुलं यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवलं आहे. याअगोदर दाऊदने आपल्या मोठ्या मुलीला माहरुखला पोतुर्गालचं पासपोर्ट काढून दिलं होतं. माहरूखचं लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैदसोबत झालं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दाऊद आता कराचीमधून आपले व्यवहार करत आहे.
दाऊदचा छोटा भाऊ मुस्तकीम अली कासकर अगोदरच दुबईत वास्तव्याला असून तो संयुक्त अरब अमीरात, बहरीन आणि कतारमध्ये दाऊद कंपनीचा व्यवहार सांभाळत आहे. मुस्तकीम संयुक्त अरब अमीरातमध्ये गारमेंटमध्ये फॅक्टरी चालवत आहे. तसेच कंपनीतील जवळच्या व्यक्तींची देखरेख करतो. ज्यांना नुकतंच कराचीतून दुबईत पाठवण्यात आलं आहे, अशा व्यक्तींची व्यवस्था करण्याचे काम त्याच्याकडे असल्याचे बोलले जाते.
कराचीमध्ये डिफेंस हाऊसिंग एरियामध्ये राहणारा दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम देखील गायब झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याचा ठावठिकाणा नाही. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी अनीस इब्राहिमने डी-कंपनीचे व्यवहार पाहण्यासाठी आपल्या मुलांना मध्य पूर्वेत अर्थात मिडल इस्टमध्ये शिफ्ट केलं आहे. तसेच दाऊदचा खास असलेला आणि वसुलीचं काम करणारा छोटा शकील देखील गेल्या काही दिवसांपासून गायब आहे.