नवी दिल्ली – ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हाबाबत बिहारच्या समता पक्षाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेतील आमदारांच्या फूटीनंतर मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला “मशाल’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आले होते. या निवडणूक चिन्हाची मुदत आज म्हणजेच 27 मार्चला संपणार होती. त्यापूर्वीच समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगवेगळे नाव आणि चिन्ह दिले होते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह दिले होते. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिले होते.
दरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिले. परंतु, ठाकरे गटाचे नाव आणि चिन्ह अद्याप बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून नवे नाव आणि चिन्ह दिले जाणार आहे.