पुणे : कोरोना कर्फ्यूमध्ये राज्यात परराज्यांतून येणारी शेतमाल वाहनांची अडवणूक रोखण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंतरराज्य फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्षासह ‘टोल फ्री’ क्रमांक सुरु केला आहे. याबाबत वाहतूकदार, शेतकरी, वाहन चालकांनी १८००-२३३-०२४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले आहे.
कोरोना कर्फ्यू आणि लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र परराज्यांतून येणारी शेतमालाची वाहने विविध ठिकाणी विविध कारणांनी किंवा अज्ञानामुळे अडवली जात आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास अहोरात्र सेवेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या सीमेवर शेतमालाचे वाहन अडविले असल्याची तक्रार आल्यास, त्या वाहनाचा प्रकार, क्रमांक, शेतमालाचे नाव, वाहन कुठून कुठे चालले आहे याची माहिती घेऊन, संबंधित राज्याच्या पणन मंडळाला कळवावी. तसेच संबंधित राज्याच्या आणि जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना याची माहिती देत प्रवेश सुकर करण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.