टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा जरी आता पुढील वर्षी घेण्यात येणार असली तरीही त्याने यजमान जपान-समोरचे संकट कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत जपानने स्पर्धा आयोजनावर तसेच अत्यावश्यक सोई-सुविधांवर प्रचंड खर्च केला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा जागतिक स्तरावरची सर्वात महत्त्वाची व मोठी स्पर्धा समजली जाते. याचे आयोजन करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक देशाचे स्वप्न असते, त्यामुळे जपानने गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिम्पिकची तयारी सुरू केली होती. आता स्पर्धा पुढे गेल्यामुळे व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यवसाय, ट्रान्स्पोर्ट व्यवसाय, गाईड, स्थानिक वाहतूक सेवा तसेच देशात येणारे खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांची निवासव्यवस्था या व अशा कितीतरी गोष्टी सुसज्ज करण्यासाठी अतोनात खर्च करण्यात आला आहे. ही रक्कम जवळपास 400 अब्ज रुपये इतकी प्रचंड होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या मोठ्या देशाचे जे वार्षिक अंदाजपत्रक असते त्यापेक्षा ही रक्कम कितीतरी पट जास्त आहे.
ही स्पर्धा पुढे गेल्यामुळे नागरिकांसह खेळाडूंचे आरोग्य जपले जाणार असले तरी त्याचा थेट परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. स्पर्धेसाठी मैदानांचे नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या जाहिरातींचे नियोजन यांवर आतापर्यंत जवळपास करोडो डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे जपानच्या लोकांना रोजगार मिळणार होता. गर्भश्रीमंत क्रीडा चाहते देशात येणार होते, त्यांच्यामुळे पर्यटन व्यवसायदेखील तेजीत येणार होता, आता या सगळ्यालाच खीळ बसणार आहे. पुन्हा पुढील वर्षी काय परिस्थिती असेल याचा अंदाजही आता कोणी करणार नाही, त्यामुळे करोनाचा प्रभाव कधी कमी होतो किंवा त्यावर पूर्ण नियंत्रण कधी मिळेल त्यानंतर जपानमध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेचे वारे वाहू लागतील.
खेळाडूंनाही फटका…..
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे गेल्याने आता या स्पर्धेसाठी अत्यंत कठोर सराव करत असलेल्या जगभरातील खेळाडूंनाही याचा फटका बसणार आहे. तयारीसाठी केलेली मेहनत तर कायम ठेवावी लागेल मात्र, त्याचवेळी पुन्हा सातत्याने निधी उपलब्ध करून देताना क्रीडा मंत्रालयाला कसरत करावी लागणार आहे.