मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक होत असल्याचे चित्र शेअर बाजारात निर्माण झाले आहे. त्याचबरोबर स्थानीक गुंतवणूकदारही सक्रिय झाल्यामुळे मंगळवारी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ झाली.
सध्या निर्देशांक विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 259 अंकांनी म्हणजे 0.55 टक्क्यांनी वाढून 47,613 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 59 अंकांनी वाढून 13,932 अंकांवर बंद झाला.
इंडसइंड बॅंकेचा शहरात सहा टक्क्यांनी वाढला. टेक महिंद्रा, ऍक्सीस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. तर नेस्ले, एनटीपीसी, पावर ग्रीड, डॉ.रेड्डीज् यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 15 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
निफ्टी बॅंक निर्देशांक 1.4 टक्क्यांनी तर धातू निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये दुसरे पॅकेज मार्गी लागले आहे. त्याचबरोबर ब्रेक्झिट मधील संदिग्धता संपत आली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. आता आगामी काळामध्ये भारतातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
गुंतवणूकदार सावध राहणार
शेअर बाजार सध्या कमालीच्या उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने विक्रीची वारे घोंगावू शकतात, असे समजणारे बरेच गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्देशांकांना चढ-उताराचा सामना करावा लागणार आहे. मात्र तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होऊ लागल्यानंतर निर्देशांकांना दिशा मिळू शकेल.