नागपूर – राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात अखेर कॉंग्रेसने झेंडा फडकवला आहे. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव करत कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत.
विधानपरिषदेवरील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुण्यापाठोपाठ नागपूरची जागाही भाजपने गमावली. वंजारी यांना 61 हजार 701 मते मिळाली, तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळविला.
महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारले, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणे हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. याबाबत चिंतन केले जाईल. आम्ही बेसावध राहिल्याने निकालात बदल दिसला. आम्ही कुठे कमी पडलो त्याचे विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही.
– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राचं चित्र कसं असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. तसेच भाजपाच्या काही नेत्यांना स्वप्न पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना अमिषं दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा. पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारख काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळ चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळाले याचा त्यांनी विचार करायला हवा. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचे साफ दिसत आहे.
– चंद्रकांत पाटील, भाजप नेते
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेत
एकत्रित येण्याचं बळ या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. तसेच आम्ही एकटं यायचे की आघाडी करुन यायचे ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. याबाबत कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचे काही कारण नाही. आमच्या वेगळे लढण्याने विरोधकांचं फावणार असेल तर तसे व्हायला नको. आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. मात्र ते दावे करीत आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
विधानपरिषदेच्या निवडणुकीतील यश ही मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानते. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार