नाशिक: शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाला करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली.
सुहास कांदे म्हणाले, 12 कोटी निधी आला यातील 10 कोटी रुपये भुजबळांनी ठेकेदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेतलं पाहिजे. भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले?, असा सवाल करतानाच भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही भुजबळांवर जोरदार टीका केली. भुजबळांनी नियोजनाचा निधी काँट्रॅक्टरच्या घश्यात घालायचं काम केलं आहे. पालकमंत्री अन्याय करत आहेत, असं करंजकर म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना स्वबळावर लढणारी संघटना आहे. पालिका निवडणुका तोंडावर आहे. आम्हाला गुंड्या-तोड्या करण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. भुजबळांनी भ्रष्टाचार केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. मी त्यांच्यासमोर केव्हाही चर्चेला तयार आहे, असं आव्हानही त्यांनी दिलं.