-चालू वर्षात 33.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होणार
-महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटक साखर उत्पादनात आघाडीवर
नवी दिल्ली -चालू साखर वर्षात पहिल्या सात महिन्यांत साखरेचे उत्पादन 32.11 दशलक्ष टनांवर गेले आहे. त्यामुळे या पूर्ण वर्षात साखरेचे उत्पादन 33 दशलक्ष टन या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे.
साखर उत्पादकांची संघटना असलेल्या इस्माने यासंबंधात म्हटले आहे की, बऱ्याच उसाचे गाळप झाले आहे आणि आता फक्त काही कारखाने साखरेचे उत्पादन करीत आहेत. 2017-18 या साखर वर्षात साखरेचे उत्पादन 32.5 दशलक्ष टन एवढे झाले होते. आता त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे .
भारताला दरवर्षी 26 दशलक्ष टन साखरेची गरज असते. उरलेली साखर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जातो. ऑक्टोबर 2018 ते एप्रिल या काळात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. आता केवळ शंभर साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी अनुक्रमे 11.26 दशलक्ष टण, 10.7 दशलक्ष टन, 4.32 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी उसाचे उत्पादन समान पातळीवर असले तरी साखरेचे उत्पादन मात्र वाढले आहे.
दक्षिणेकडील राज्यापेक्षा उत्तरेकडील राज्यातील साखरेचा उतारा जास्त असतो. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात या वर्षी साखरेचे उत्पादन अधिक झाले आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसानंतर साखरेचे उत्पादन हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. 2018-19 अखेरीस भारतातील साखरेचा शिल्लक साठा 14.7 दशलक्ष टन होता.