मुंबई – शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा फेरा सुरू झाला आहे. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारकडे बोट दाखवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन नेते म्हणजे शिवसेना नाही. ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा का ओरड केली नाही? असा सवाल करतानाच तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेवरही टीका केली. राज्य सरकरच्या आरोग्य भरती प्रक्रियेतील गोंधळ सुरू असताना आता राज्यातील भरती परीक्षा घेणाऱ्यांचे पॅनल हे अन्य राज्यांचे का? यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. परीक्षांमध्ये घोळ होतोय, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
दरम्यान,यावेळी जीएसटीच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जीएसटीमधील त्रुटी दूर करून उपाय सुचविण्यासाठी मंत्र्यांची जी उपसमिती केंद्राने बनवली आहे. त्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. या समितीचा फायदा फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा होईल, असे त्यांनी नमूद केले.