मुंबई – महागाई वाढत असल्यामुळे जागतिक पातळीवर व्याजदर वाढीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदाराकडून खरेदीबरोबर विक्री चालू आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये केवळ 44 अंकांनी वाढ होऊन 61,319 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक नीफ्टी 0.11 टक्क्यानी म्हणजे 23 अंकांनी वाढून 18,035 अंकावर बंद झाला. कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील अनेक देशात महागाई जास्त पातळीवर आहे.
अशा परिस्थितीत त्या देशातील रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जास्त पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार जास्त मोठे व्यवहार करण्यास पुढे येत नाहीत.
टेक महिंद्रा कंपनीचा शेअर साडेपाच टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील, नेस्ले, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, विप्रो, बजाज फिन्सर्व या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, ऍक्सिस बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली.
भारत सरकारने विंड फॉल टॅक्समध्ये कपात केली आहे. त्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. अमेरिकेत रोजगार निर्मिती वाढली आहे. महागाई कमी होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.93 टक्क्यांनी व स्मॉल कॅप 0.90 टक्क्यांनी वाढला. रिऍल्टी, धातू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक वाढले. तर वित्तीय सेवा, ग्राहक वस्तू, वाहन, बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.
परदेशी गुंतवणूदारांकडून खरेदी –
दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या आठवड्यात खरेदी सुरू केल्याचे वातावरण आहे. बुधवारी या गुंतवणूकदारांनी 432 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सोमवारी, मंगळवारीही या गुंतवणूकदारांनी खरेदी केली होती. जर हे गुंतवणूकदार खरेदी करणार असतील तर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात आगेकूच करू शकतात. चीनमध्ये नकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतात खरेदी करीत असल्याचे बोलले जाते.