मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर आहेत, त्याचबरोबर जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शेअरबाजारातील वातावरण कमालीचे अस्थिर आहे. कालच्या प्रमाणे आजही शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या मोठ्या लाटा आल्या. वाहन व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून बऱ्याच गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांकात अल्प घट नोंदली गेली.
बाजार होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 29 अंकांनी कमी होऊन 58,250 अंकांवर बंद झाला. पूर्ण दिवसामध्ये सेन्सेक्स 400 अंकांनी कमी-जास्त झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आठ अंकांनी म्हणजे 0.05 टक्क्यांनी कमी होऊन 17,353 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्याबरोबर नेस्ले कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाली.मारुती, बजाज फिन्सर्व, बजाज ऑटो, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही बुधवारी घट नोंदले गेली.
मात्र अशा परिस्थितीतही कोटक बॅंक, टायटन, एनटीपीसी, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. त्यामुळे निर्देशांकाची मोठी हाणी टळल्याचे दिसून आले. रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार अस्वस्थ असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर नफेखोरी झाली.
वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादन आधारित अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बऱ्यापैकी खरेदी झाली. गेल्या काही दिवसापासून मिड कॅप व स्मॉल कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे त्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले होते. आज या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली असल्याचे दिसून आले.