सोलापूर – जर मनात जिद्द असेल तर अशक्य ही शक्य कलं जाऊ शकतं. याचा प्रत्यय सोलापुरात आला आहे. येथिल दोन ज्येष्ठ व्यक्तीनी अशी काही कामगिरी केली आहे की त्यांचं जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केलं जात आहे. दोघा ज्येष्ठांनी दुध-केळी खाऊन सायकल प्रवास करत तब्बल 2600 किमी अंतर पार करून कन्याकुमारीला पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूरातील विठ्ठल कदम (वय 70) आणि श्रीशैल नवले (वय 60) हे दोघे मित्र आहेत. हे दोघे सोलापुरातील नीलम नगर परिसरात राहतात. दोघांना फोटोग्रापीचा छंद होता. सध्या विठ्ठल कदम यांचा विटभट्टीचा तर नवले यांचा प्लाॅटिंगचा व्यवसाय आहे. दोघांचे व्यवसाय भिन्न असले तरी त्यांचे विचार मात्र सारखेच आहेत.
दोघांनी ठरवलं की 2600 किमीचा सायकल प्रवास करून सोलापूरहून कन्याकुमारी गाठायचे आणि स्वामी विवेकानंदांचे स्मारक पाहायचे. त्यानंतर त्यांनी योजना आखली आणि प्रवास सुरु केला. प्रवासात त्यांनी भाजी-भाकरी सोडून दुध केळी, लिंबूपाणी, नारळपाणी पिऊन त्यांनी हे मोठं अंतर पार केलं. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये विशेष बाब म्हणजे विठ्ठल कदम यांनी मागील सहा वर्षांपासून मौन धारण केले आहे. ते कोणाशीही बोलत नसल्याचे सांगितले जाते, जे काही सांगायचे आहे, ते एका चिठ्ठीवर लिहून सांगतात.
हे मोठं अंतर त्यांनी दररोज 10 तास सायकल चालवून पार केले आहे. तासी 12 किमी अंतर त्यांनी पार केलं. प्रवासात त्यांनी रात्रीचा मुक्काम मंदिर किंवा मिळेल ती रूम घेऊन केला. 24 फेब्रुवारीला दोघे कन्याकुमारीत पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी तेथे समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटला. स्वामी विवेकानंदाचे स्मारक पाहिले, साहित्य जाणून घेतले.