मुंबई – शेतकरी संघटनांच्यावतीने काल तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमुळे सरकार पुरस्कृत अराजकतेला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे असे शिवसेनेने म्हटले आहे.
पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात हा दावा करण्यात आला आहे. यात शिवसेनेने म्हटले आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वताच्या राजकीय लाभासाठी देशात दहशतीचे आणि घबराटीचे वातावरण तयार केले आहे. देशातील अस्थैर्य कमी करण्याऐवजी त्यांनी ते वाढवतच ठेवले आहे.
भारतबंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपच्या लोकांनी मोठी आगपाखड केली आहे त्यावर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्यात काय चूक होती ते समजले नाही.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर खलिस्तानी असल्याचा शिक्का मारून भाजपने शेतकऱ्यांवरच देशात अराजक निर्माण केल्याचा खोटा आरोप केला. पश्चिम बंगालमध्ये भाजप अराजकतेचेच राजकारण करीत आहे. तेथे त्यांनी धार्मिक विभाजन केले आहे.
त्या राज्यात रक्ताचे पाट वाहतील आणि हिंसाचार माजेल अशाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. अशा धमक्या देणे हेच खरे अराजक आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगाने सोडवले असते तर ते आत्तापर्यंत घरी गेले असते असेही यात नमूद करण्यात आले आहे.