पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. तरीही येथे पक्षकार गर्दी करत आहेत. बुधवारी सुमारे एक हजार, तर गुरूवारी 600 ते 700 पक्षकार सुनावणीसाठी हजर राहिले होते. केवळ जामीन, अटकपूर्व, मनाई आदेश आणि रिमांडवर सुनावणी होत आहे. इतर प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षकारांनी न्यायालयात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतिश मुळीक यांनी केले.
उच्च न्यायालयाने केवळ महत्त्वाच्या प्रकरणातच सुनावणी करण्याचा आदेश दिला आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या तीन तासातच न्यायालय सुरू आहे. पक्षकारांनी गरज असेल, तरच न्यायालयात यावे. अन्यथा येऊ नये, असा निर्णय पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या बैठकीत नुकताच झाला.
येरवडा कारागृहातील बंदीना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येत आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी करून न्यायालयाने नुकतीच एक शिक्षाही सुनावली. पक्षकार हजर न झाल्यास अपरोक्ष कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही पक्षकारांकडून न्यायालयात करण्यात येणारी गर्दी अनाठायी आहे.
याविषयी अॅड. मुळीक म्हणाले, पक्षकार विनाकारण न्यायालयात येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ते सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत. पक्षकारांनी गांभीर्याने यावर विचार करावा. उगीचच न्यायालयात येऊ नये. नागरिकांनी सुनावणीबाबत कोणतीही भीती बाळगू नये. त्यांच्या अपरोक्ष सुनावणी होणार नाही.