मुंबई – आयटी कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. ते नफादायक असतील या शक्यतेमुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे मंगळवारी पुन्हा निर्देशांकात वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.54 टक्क्यांनी म्हणजे 260 अंकांनी उसळून 48,437 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 66 अंकांनी वाढून 14,199 अंकावर बंद झाला.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, टीसीएस, एचडीएफसी बॅंक, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, टायटन, एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर ओएनजीसी, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला.
निर्देशांक व उच्च पातळीवर असल्यामुळे सकाळी शेअर बाजारात नफेखोरी होऊन निर्देशांकात घट झाली होती. मात्र नंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि बॅंकांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला, असे रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख विनोद मोदी यांनी सांगितले. भारतात लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे निर्देशांक वाढत आहेत.
कंपन्यांचे बाजार मुल्य 191 लाख कोटी
दरम्यान गेल्या आठ महिन्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 191 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. भारतातील स्थूल अर्थव्यवस्था व उत्तम असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. लसीकरण लवकरच सुरू होणार आहे.
कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे वाटत असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. सरलेल्या वर्षात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 15.7 टक्क्यांनी वाढला आहे.