मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडून आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर मंत्रिमंडळात बदल होणार का?, त्यांना कोणतं मंत्रिपद देण्यात येणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून याबाबत शरद पवारांनी मोठा खुलासा केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतरही मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत. सगळेजण आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल. खडसे यांनी एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे काहीही काळजी करण्याचे कारण नाही. असे शरद पवार म्हणाले.
एकनाथ खडसे यांनीही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले आहे. 40 वर्ष भाजपाचे काम केले. भाजपा पक्ष ज्या गतीने वाढवला त्याच्या दुप्पट गतीने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काम करेन, असे एकनाथ खडसे म्हणाले.
त्यामुळे सध्यातरी एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.