सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने संसदेत केलेले कृषी कायदे आणि पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून देशभरात उपोषण, धरणे आंदोलने करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस या इंधनावरील लावलेल्या बेसुमार करामुळे दरवाढ होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. मोदी सरकारच्या हिटलरशाहीमुळे हे घडत आहे, असा आरोप जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जिल्हा व तालुका स्तरावर उपोषण, आंदोलने करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. “मोदी हटाव, देश बचाव’, “मागे घ्या मागे घ्या, इंधन दरवाढ मागे घ्या’, “शेतकरीविरोधी कायदे रद्द करा’, “मोदी सरकार हाय हाय’, अशा घोषणा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलनात ऍड. विजयराव कणसे, बाळासाहेब शिरसाट, नाना लोखंडे, धर्यशील सुपले, मनोज तपासे, ऍड. दत्तात्रय धनवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, शहराध्यक्ष रजिया शेख, माधुरी जाधव, मालन परळकर सहभागी झाल्या होत्या.