मुंबई – मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान आहे, अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो आहे. विस्थापित मावळा यांना स्वराज्यात संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालो, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, माझी उमेदवारी सगळ्या पक्षातील लोकांनी मदत करावी, यासाठी होती. माझे व्यक्तिमत्त्व निष्कलंक आहे. ते लक्षात घेऊन तुम्ही मला मदत करा. पण ते होताना काही दिसत नाही आणि घोडेबाजार होऊ नये. म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाही. पण ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
2009च्या लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जनतेनीही प्रेम दिले. लोकांची इच्छा होती, कष्टकरी, ग्रामीण भागातील युवक, शहरी भागातील युवक या सगळ्यांना तुम्ही संघटित करा. माझ्याकडेही ही आज आलेली संधी आहे, माझा कोणावरही द्वेष नाही. माझी स्पर्धा ही माझ्याबरोबर आहे.
म्हणून विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्यची स्थापना करून या गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी, न्यायासाठी जे लढतायत त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी मी ठामपणे स्वराज्याच्या मागे उभे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
माझ्या फॉर्मवर ज्या आमदारांनी सह्या केल्या, त्यांच्या मी पाठीशी राहणार आहे, त्यांचे मी आभार मानतो. मला ऑफर दिली होती, पक्षात या आणि खासदार व्हा, पण ठरवले होते, मी त्यांच्याकडे जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आलेत, राजे ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, पण मला घोडेबाजारसाठी निवडणूक लढवायची नाही. तसेच शिवसेना मला अस्पृश्य नसल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
मी आज मुंबईला आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलायची माझी मुळीच इच्छा नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, आपण कुठल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असेल, आपण दोघांनी तिथे जायचे, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचे. जर संभाजी छत्रपती खोटे बोलत असेल तर तुम्ही पहिले सांगाल, असेही संभाजीराजेंनी सांगितले.