मुंबई – संभाजीराजे यांनी खासदार न होणे दुर्देवी आहे. इतर पक्षांचे माहीत नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी कॉंग्रेसची मनापासून इच्छा होती, अशी पोस्ट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच कॉंग्रेसचा त्यांना पाठिंबा असल्याचे सांगितले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवारीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. शिवसेनचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले. संभाजीराजेंच्या या पत्रकार परिषदेनंतर आता नाना पटोलेंनी ट्विटवरुन या प्रकरणावर भाष्य केले. यानंतर महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
नाना पटोले यांनी ट्विट केले की, संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी आहे. त्यांनी राज्यसभेवर जावे, ही कॉंग्रेसची मनापासून इच्छा होती. इतर पक्षांचे माहित नाही, परंतु कॉंग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील, अशी पोस्ट नाना पटोलेंनी केली.दरम्यान, राज्यसभा निवडणूक
अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता संभाजीराजे छत्रपती पुन्हा खासदार होणार नाही, हे स्पष्ट झाले. यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भातही उघडपणे नाराजी व्यक्त केली.
“शिवसेना शब्दाला जागणारा एकमेव असा देशातील पक्ष आहे. शिवसैनिकांवर आणि आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राज्यसभेत आणि लोकसभेत संख्येला महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या अधिकृत उमेदवारालाच राज्यसभेवर जायला पाहिजे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जड अंतःकरणाने शिवसैनिकाला डावलून संभाजीराजेंना जागा द्यायला तयार होते. परंतु राजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी इच्छा होती. राजेंना बंधन नको होते. त्यांना अपक्ष लढायचे होते.”
– अरविंद सावंत, खासदार, शिवसेना
शिवसेना आपल्या धोरणानुसार वागली – संजय राऊत
शिवसेना आपल्या धोरणानुसार वागली आहे. आम्ही आमची सहावी जागा संभाजीराजेंना देऊ केली होती. मतांची व्यवस्था केली होती. संभाजीराजे छत्रपतींना आम्ही राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रस्ताव दिला होता परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला प्रेम, आदर, आस्था आहे. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.