कोल्हापूर- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्यानंतरच युवराज संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीमागे फडणवीसांची राजकीय खेळी होती. बहुजनांच्या मतांची विभागणी हा डाव होता. मात्र या साऱ्या प्रक्रियेत छत्रपती घराणे कुठे येत नाही. तेव्हा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला नाही याचा अर्थ तो छत्रपती घराण्याचा अपमान असे म्हणता येणार नाही.
निवडणुकीबाबत संभाजीराजेंचा निर्णय हा त्यांचा वैयक्तकि होता. असा खुलासा श्रीमंत शाहू महाराज यांनी केला.
युवराज संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याविषयी शिवसेनेसोबत फायनल मसुदा तयार झाला नव्हता असे दिसते. त्यामुळे पाठिंब्यावरुन शिवसेनेने यु टर्न मारला असे म्हणता येत नाही असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शाहू महाराज म्हणाले, भाजपाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. स्वराज्य संघटना स्थापणार असे म्हटले. संघटना स्थापण्याच्या घोषणेनंतर त्यांच्यापुढे स्वत:च्या ताकतीवर पुढे जाणे किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेणे असे दोन पर्याय होते. इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याविषयी त्यांनी आवाहन केले. मात्र हे आवाहन करताना त्यांनी अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला हवे होते.
राज्यसभेच्य निवडणुकीसाठी संभाजीराजे यांच्या जानेवारीपासून हालचाली सुरू झाल्याचे दिसते. पण त्यांनी कधीही निवडणुकीसंबंधी माझ्यासोबत अथवा कुटुंबांतील अन्य सदस्यांशी चर्चा केली नाही. राज्यसभेची निवडणूक लढवायची हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे. असे महाराज म्हणाले.
संभाजीराजे यांची 2016 मध्ये त्यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाली. त्याला आमचा विरोध होता. त्यावेळी आम्ही त्यांना खासदारकी नको असे सांगितले होते. तेव्हाही त्यांनी तो निर्णय वैयक्तिक घेतला. त्यांनी, 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती.
त्या निवडणुकीनंतर युवराज संभाजीराजे यांनी गेल्या काही वर्षात जी राजकीय पावले उचलली त्याविषयी आमच्यासोबत कधीही चर्चा नाही. त्यांच्या पातळीवर त्यांनी निर्णय घेतले. स्वराज्य संघटना स्थापण्याची घोषणा केली आहे. संघटना स्थापून राजकारणात पुढे जायची त्यांची भूमिका दिसते, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही महाराज म्हणाले.
चौकट–
संजय पवारांना फोन लावून केले अभिनंदन
शिवसेनेकडून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी संजय पवार यांना फोन करुन अभिनंदन केले. संजय पवार हे गेली अनेक वर्षे पक्षात काम करत आहेत. त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी मिळाली याचा आनंद आहे. शिवसेनेने कार्यकर्त्यांना संधी दिली. उमेदवारीवरुन शब्द फिरवला नाही, असेही महाराज म्हणाले.