पुणे – राज्यातील शेकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्यसरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात चार दिवस ओल्या दुष्काळाची पाहणी केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताने संभाजीराजे म्हणाले,” राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. अशावेळी त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये, त्याऐवजी सामुहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी राज्याने सर्वप्रथम ओला दुष्काळ जाहीर करावा.
त्यानंतर केंद्राकडून मदत मिळू शकते. केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करुन द्यायला पाहिजे. आताच मदत जाहीर केली नाही तर शेतकऱ्यांना रब्बीची तयारी करता येणार नाही.”
केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली तर मी दिल्लीत पाठवपूरावा करण्यास तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत अशा तक्रारी आहेत. पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे योग्यप्रकारे पंचनामे झाले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विमा कंपन्यांची कॉलर पकडली पाहिजे
एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अद्याप कोणत्याही प्रकारची मदत त्यांना मिळालेली नाही. त्यातच विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईबाबत जाचक अटी लादल्यात, असं असेल तर मदत कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत, सरकारने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कॉलर पकडावी असा सल्ला छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.
…तर शेतकऱ्यांची भूमिका हीच माझी भूमिका राहील.
जे छत्रपती शिवाजी राजे म्हणाले होते तेच मला म्हणायचे आहे. आपला पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे. त्याला मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करेन. मात्र जर शेतकऱ्याला मदत मिळविण्यात अपयश आले, तर शेतकऱ्यांची भूमिका हीच माझी भूमिका राहील.