मुंबई – भारत सरकारने चिनी गुंतवणूक मागे सारली आहे पण त्यांना लडाख मधे घुसलेले चिनी सैनिक मागे सारण्यात मात्र अपयश आले आहे अशी टीका शिवसेनेचे नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केली आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील कॉलम मध्ये त्यांनी ही टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की चिनी गुंतवणुकदारांची भारतातील गुंतवणूक रोखून धरण्याऐवजी लडाख मध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांना मागे सारणे ही भारत सरकारची महत्वाची जबाबदारी होती. पण केंद्रातील सरकारला आपली जबाबदारी ओळखता आलेली नाही. त्यांनी प्रत्येक गोष्टीचे राजकारण सुरू केले आहे.
हे असेच चालत राहिले तर सोव्हिएत रशियाची जशी शकले झाली तशीच देशाची शकले होण्याचा धोका देशापुढे उभा राहु शकतो. करोनाच्या संबंधातही भारत सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की करोनामुळे संकटात आलेल्या आपल्या नागरीकांच्या मदतीसाठी अमेरिकेच्या सरकारने प्रत्येकी 85 हजार रूपये प्रति महिना मदत केली आहे.
पण अशा प्रकारची मदत भारतात कुठेच दिसत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहींत पण निवडणुका जिंकण्यासाठी मात्र त्यांच्याकडे पैसे आहेत. विरोधकांची सरकारे पाडण्यासाठीही आणि आमदारांची फोडाफोडी करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे आहेत.
आज देशाची अर्थव्यवस्था पार खालावली असून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा देशावरील कर्जाचे प्रमाण खूप झाले आहे अशा स्थितीत पंतप्रधानांना निवांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुकच केले पाहिजे असेहीं त्यांनी म्हटले आहे.