पिंपरी – मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश घेताना भरलेल्या ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींमुळे अनेकांचे अर्ज बाद झालेले आहेत. मात्र, शिक्षण संचालनालयाने वेबपोर्टलमध्ये बदल करुन ऑनलाईन अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यासाठी, 4 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून 8 एप्रिल रोजी पहिली फेरी घेण्यात आली. यामध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना पडताळणी समितीव्दारे कागदपत्रांची तपासणी करुन शाळेत जावून प्रवेश घेतले असून पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसरी फेरी घेण्यापूर्वी पालकांना अर्ज दुरुस्तीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यानुसार ज्या पालकांनी अर्ज भरला परंतु “कन्फर्म’ ऑप्शनवर क्लिक केले नाही त्यांनी तो “कन्फर्म’ करावा. ज्या पालकांना प्रवेश मिळाला नाही अशा पालकांनी त्यांचे “गुगल लोकेशन’ चुकले ते दुरुस्त करता येईल. “लोकेशन’ दुरुस्त केल्यानंतर शाळेची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र, जन्मतारीख व नावात बदल करता येणार नाही. अन्य दुरुस्ती करता येईल.
ज्या पालकांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेवू शकले नाही अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडताळणी समितीने करावी. पालकांची चूक अथवा तांत्रिक चूक असल्यास लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करावी. ज्या पालकांनी घराचे अंतर 3 कि.मी. पेक्षा जास्त असताना 1 कि.मी. च्या आत दाखविले आहे. अशांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे अशांची दुरुस्ती करण्यात येवू नये, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी म्हटले आहे.