दुसरी फेरी पुर्ण : 759 विद्यार्थ्यांना प्रवेश
पिंपरी – मोफत शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आरक्षित जागांची दुसरी फेरी पार पडली. या फेरीमध्ये 759 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून 1023 जागा शिल्लक राहिल्या आहेत.
या वर्षी आरटीईअंतर्गत शहरातील 176 शाळा पात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये दोन हजार 133 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर, दुसऱ्या फेरीअखेर 759 विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे आतापर्यंत एकूण 2 हजार 898 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. याचबरोबर, दुसऱ्या फेरीत 11 अर्ज बाद झाले आहेत.
“आरटीई’साठी यंदा 3 हजार 915 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी पहिल्यांदाच “आरटीई’च्या पहिल्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाले आहेत. यापैकी 50 टक्के कोटा पहिल्या फेरीतच पूर्ण झाला आहे. प्रवेशासाठी एकूण 21 हजार अर्ज आले असून तिसऱ्या फेरीसाठी 1 हजार 23 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. यामुळे, आता तिसरी फेरी कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालकांचे दुर्लक्ष
“आरटीई’च्या प्रवेश फेऱ्यांमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासंबंधी वारंवार मोबाईलवर माहिती देण्यात येते. मात्र, काही पालकांनी शाळा व शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे एक हजार 720 विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. तसेच, दोन फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी “लॉटरी’ लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी तेरा विद्यार्थी कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत.