मुंबई – भारतीय संघाने 1983 नंतर 28 वर्षांनी 2011 साली पुन्हा एकदा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली मात्र, त्यावेळी संघात स्थान मिळविण्यात मला अपयश आले होते, हा क्षण माझ्यासाठी खूपच निराशाजनक होता. मला असे वाटले की माझ्या हातून खूप काही निसटले आहे, अशा शब्दात भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या स्पर्धेसाठी जेव्हा संघ निवड झाली व मला त्यात स्थान नव्हते ते समजल्यावर मी खूप निराश झालो होतो. या स्पर्धेपूर्वी मला अनेक सामन्यांमध्ये अपयश आले होते. मी नेटमध्ये खूप मेहनत घेत होतो पण प्रत्यक्ष सामन्यात माझ्या धावा होत नव्हत्या. याच सुमार खेळामुळेच मला त्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. वस्तुस्थिती मी नाकारत नाही. त्यावेळी निवड समितीने मला वगळले त्याला माझेच अपयश कारणीभूत होते. आज भूतकाळात डोकावले तर ती स्पर्धा माझ्याहातून गेल्याचे दुःख आजही वाटते, असेही रोहित म्हणाला.
करोना विषाणूंच्या धोक्यामुळे सध्या जगभरातील अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत तसेच आयपीएलसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगभरातील खेळाडू त्यामुळे आपापल्या घरातच असल्याने रोहितने आपल्या जुन्या आठवणींना तसेच त्यामागच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. स्पर्धा तसेच सरावही बंद झाल्याने मला आता माझ्या कुटुंबाला तसेच माझ्या मुलीला मला वेळ देता येत आहे याचा सर्वाधिक आनंद आहे. मालिकांमध्ये व्यस्त असल्याने मला कुटुंबाला वेळच देता येत नाही. मात्र, सामने नसल्याने आलेली निराशा मुलीबरोबर खेळल्याने क्षणातच नाहीशी होते, असेही रोहितने सांगितले.