मुंबई – राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी चार हजार चारशे कोटी रुपये कर्ज उभारणीचा प्रस्ताव “एशियन डेव्हलपमेंट बॅंके’कडे देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या इमारती तसेच उपकरणांची कमतरता भरून निघेल, असे ते म्हणाले.
टोपे म्हणाले, भविष्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) वर भर देण्याचा विचार आहे. महाबळेश्वर तालुक्यात अशाप्रकारे केलेल्या प्रयोगाचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. पुढील काळात करोना व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय, मूत्रपिंड इत्यादीसह कर्करोग आदी सहव्याधी असलेल्या रुग्णांकडे लक्ष देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात सहव्याधी असलेले 23 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दिवसभरात 5 हजार रुग्णांची भर
राज्यात दिवाळीनंतर आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून 5 ते 6 हजारांच्या दरम्यान रुग्ण वाढत आहे. रविवारी 29 नोव्हेंबरला दिवसभरात रुग्णसंख्येत 5 हजार 544 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोनारुग्णांचा एकूण आकडा हा 18 लाख 20 हजारांच्या वर गेला आहे. तर 85 जणांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 4 हजार 362 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 16 लाख 80 हजार 923 एवढी झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.26 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 91 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.