नवी दिल्ली – देशातील जीडीपीचे नवीन आकडे जाहीर झाले आहेत. त्या आकडेवारीनुसार मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आता पहिल्यांदाच मंदीच्या काळात अधिकृतपणे प्रवेश केला आहे असे नमूद करीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्या सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील तब्बल तीन कोटी लोक मनरेगातून रोजगाराची कामे मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना रोजगार मिळालेला नाही. हुकूमशाही पद्धतीने आदेश देऊन अर्थव्यवस्था वर नेता येऊ शकत नाही, पंतप्रधानांनी मुळात ही मूलभूत संकल्पना समजून घेण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
जुलै ते सप्टेंबर या अवधीत भारताची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी घसरली आहे. त्या आधीच्या तिमाहीत एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत आणखीनच घसरण होऊन भारताचा जीडीपी उणे 23.5 टक्के इतक्या नीचांकी अवस्थेत गेला आहे.
त्या उलट भारताच्या शेजारील अन्य आशियाई देशांची कामगिरी भारतापेक्षा अधिक चांगली नोंदवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हा निशाणा साधला आहे.