कात्रज, (धीरेंद्र गायकवाड)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या दक्षिण उपनगरीय भागातील उमेदवारांनी मोर्चेबांधणी केली असून प्रभाग जाहीर होताच फक्त प्रचाराचे नारळ फोडण्याचे काम उर्वरित ठेवले आहे.
लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतरच अनेकांनी आपापल्या प्रभागसह पूरक प्रभागाची चाचपणी करून ठेवली आहे. त्यातच दिवाळीच्या मुहुर्तावर “फराळ’ कार्यक्रमातून अनेकांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. विविध बक्षिसांची लयलूटही अनेकांनी केली आहे. याशिवाय आरोग्य शिबिर, लसीकरण अशा माध्यमातून मतांची गोळाबेरीज करण्याचाही प्रयत्न केला आहे. कात्रज परिसरासह धनकवडी, आंबेगाव पठार, बालाजी नगर, संतोष नगर, सुखसागर नगर, गोकुळ नगर व महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकर वाडी परिसरातून अनेक नवे उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारीत आहेत.
आताची राजकीय पक्षांची “ताकद’…
कात्रज परिसरातील राजकीय स्थिती पाहिली असता येथे प्रभाग क्र.40 मध्ये राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नगरसेवक आहे. धनकवडी-सहकारनगर प्रभाग क्र.39 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन तर भाजपप्रणीत एक नगरसेवक आहे. प्रभाग क्र.38 राष्ट्रवादी आणि भाजपचे बलाबल असून दोन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत. यावेळी शिवसेना, कॉंग्रेस, मनसे या पक्षाने आव्हान देण्याची तयारी केली असून रासप, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पार्टी निर्णायक भूमिका घेऊ शकते.
समाविष्ट गावातही असेल चुरस…
मागील निवडणुकीमध्ये पराभूत झालेले तसेच संधी न मिळालेल्या उमेदवारांची भूमिका काय? हे गुलदस्त्यातच आहे. तर, पालिकेतील किंवा या उपनगरीय भागात सत्ताधारी आपली सत्ता घरामध्येच राखून ठेवण्यासाठी आपल्या पिढीकडे सोपविण्याच्या प्रयत्नात आहेत. समाविष्ट गावांत गावकी-भावकीचे राजकारण आखले जात असून “प्रथम नगरसेवक’ होण्याचा मान मिळवण्यासाठी उमेदवारांची संख्या वाढत आहे. यामध्ये महिला उमेदवारांची संख्याही मोठी आहे. समाविष्ट गावातील फ्लेक्स्वर असे उमेदवार झळकू लागल्याने निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचे अधोरेखित होत आहे.
“वेट अँड वॉच’
कात्रज, धनकवडी, बालाजीनगर नव्याने समाविष्ट गावे येथून युवक नेतृत्वाला तसेच कार्यक्षम असणाऱ्या उमेदवारांना कोणते पक्ष आपले तिकीट देणार व कोण बंडखोरी करणार, हे आता प्रभागरचना नंतरच सर्व गणिती जुळून येणार तोपर्यंत “वेट अँड वॉच’ अशी स्थिती आहे. मात्र, प्रस्थापितांना धक्का बसणार, नव्याने नवीन उमेदवार निवडून येणार, सत्तासंघर्ष कोणत्या शिगेपर्यंत पोहोचणार, हे आता येणाऱ्या काळात दिसेलच.