पुणे – शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सायंकाळी सहानंतर चौकाचौकात बॅरिकेडस लावून बाहेर पडणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पहिले एक दोन दिवस तरी पोलीस सौम्य भुमिका घेण्याच्या पावित्र्यात आहेत. दरम्यान उद्योगधंदे व खासगी अस्थापनांवरीली कर्मचाऱ्यांना कामावर येजा करण्यास परवानगी असणार आहे. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र किंवा संबंधीत कंपनीचे संमंतीपत्र असणे आवश्यक आहे. हे दाखवल्यानंतर पोलीस त्यांची अडवणूक करणार नाहीत.
कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अस्थापनांनी त्यांना ओळखपत्र किंवा संमंतीपत्र द्यावे असे आवाहन पोलिसांनी अस्थापनांना केले आहे. वैद्यकीय व इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडणाऱ्यांनी तशी कागदपत्रे जवळे ठेवणे आवश्यक आहे. संचारबंदीची अंमलबजावणी कडक पध्दतीने करण्यात येणार आहे.
सबळ कारण नसताना दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. शहराचे प्रवेशव्दार व अन्य ठिकाणी 96 तपासणी नाके असणार आहेत. तर जवळपास चार हजार पोलीस संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर असतील.