पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह शहरात संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगावे. वैद्यकीय काम तसेच तातडीने बाहेरगावी जाणाऱ्यांना सहकार्य करण्यात येईल.
नागरिकांनी शक्यतो घराजवळील दुकानांतून भाजीपाला, किराणा माल खरेदी करावा, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. यासाठी सहा ते सात हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर आहेत.
प्रशासनाबरोबर चर्चा करून पोलिसांनी आदेश काढले आहेत. नागरिकांनी कारणाशिवाय संचार करू नये. पोलिसांनी ओळखपत्राची मागणी केल्यास त्यांना सहकार्य करावे. घराजवळील दुकानातून जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करावी, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले.
नाकाबंदीत एखादी व्यक्ती जीवनावश्यक वस्तू घेऊन दुचाकीवरून जात असल्यास त्यांची चौकशी होऊ शकते. शहरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. ते राहात असलेल्या इमारतीतील रहिवासी तसेच तरुणांनी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यास मदत करावी, असे त्यांनी नमूद केले.
शहरात शनिवार, रविवार या दोन दिवशी कडक निर्बंध राहणार आहे. या दिवशी सर्व व्यवहार बंद असतात. दूध, भाजीपाला, किराणा माल, औषध दुकाने सुरू राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी शनिवार, रविवार सोडून अन्य दिवशी करावी. गेल्या शनिवारी, रविवारी शहरात टाळेबंदी होती. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले होते, असे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.