पुणे – विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 50 निवारागृहे, साखर कारखान्यांमार्फत 110 निवारागृहे सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 50 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 442 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 246 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3442 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी माहिती दिली.
दिनांक 1 एप्रिल, 2020 ते दिनांक 3 एप्रिल, 2020 अखेर सदर कक्षात विस्थापित कामगारांच्या एकूण 349 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारीचे महसूल विभागामार्फत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.