राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खरीप रब्बी हंगामात जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले होते. या कर्जाची परतफेड 31 मार्चपूर्वी केल्यानंतर तीन लाखाच्या आत कर्ज असणाऱ्यांना शून्यटक्के व्याज व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी जिल्हा बँकेच्या बाहेर रांगा लावून पीक कर्जाचा भरणा करत होते त्यामुळे करोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याची बातमी दैनिक प्रभातने दिल्यानंतर जिल्हा बँकेने या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन पीक कर्जाला आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. अशातच पिक कर्ज 31 मार्चपूर्वी भरल्यास या पीक कर्जावर 50 हजार रुपयांची सवलत मिळणार असल्याने शेतकरी जिल्हा बँकेचे बाहेर गर्दी करुन पीक कर्जाच्या पैशाचा भरणा करत होते. या गंभीर परिस्थितीची बातमी दैनिक प्रभात’ने दिल्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेऊन तातडीने या पीक कर्जाची मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.
याबाबत खेडचे आमदार व जिल्हा बँकेचे संचालक दिलीप मोहितेपाटील यांनी सांगितले की, लाखाचे पीक कर्ज शून्य टक्के दराने जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यांनी ज्यांनी कर्ज रक्कम व थकबाकी भरली त्यांना ३ ते ४ एप्रिल रोजी कर्ज वाटप केले जाणार आहे. ज्यांनी भरले नाही त्यांना ३० जून पर्यंत पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार आहे. ज्यांनी कर्ज भरली आहेत त्यांचे नव्याने कम बनविले जाणार नाही. त्यांना ताबडतोब कर्ज वाटप केले जातील. राज्य सरकार व केंद्राकडे मागणी केली आहे. त्यांनी पीककर्ज भरण्यास सवलत दिली आहे. करोना विषाणूचेचे सावट आहे. शेतकऱयांनी बँकेत गर्दी करू नये. पीक कर्जाची रक्कम सोसायटीचे चेअरमन व सचिवांकडेजमा करावी, त्यांच्या माध्यमातून बँकेत कर्ज खात्यात भरले जातील त्यामुळे बँकेत गर्दी होणार नाही. सर्वाना आवाहन आहे आपण ३१ मार्च पूर्वी कर्ज रक्कम जमा करावी. शून्य टक्के व शासनाच्या सवलतीचा फायदा घ्यावा.