लखनौ – उत्तर प्रदेशची जबाबदारी स्विकारून गलितगात्र झालेल्या पक्ष संघटनेला ऑक्सीजन देण्यात गुंतलेल्या कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीच 2022 मध्ये या राज्यात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
प्रियांका यांची दोन दिवसांपूर्वी प्रयाग राज येथे दिलेली भेट आणि त्यांनी तेथे केलेले गंगास्नान हे कॉंग्रेसला राज्याच्या राजकीय चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी कॉंग्रेसने हिंदुत्वाची कास धरल्याचा प्रतिकात्मक संदेश होता असे मानले जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या राज्याच्या राजकारणात प्रचंड सक्रिय झाल्या आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही त्यांनी भेट देत आपली संवेदना व्यक्त केली होती व सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक त्यांनी मौनी अमावस्येचे निमित्त साधनत प्रयागराज येथील संगमावर जात स्नान केले.
स्वत: नाव चालवत त्यांनी संगम गाठले. कॉंग्रेस हा खरेतर सर्वसमावेशक पक्ष. मात्र तो हिंदू विरोधी असल्याचे चित्र गेल्या काही काळात निर्माण झाले आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत समितीनेही लोकसभेतील पराभवाचे जे विश्लेषण केले होते त्यात याच मुद्द्यावर बोट ठेवले होते.
कॉंग्रेस हा हिंदूविरोधी पक्ष असल्याची प्रतिमा जनमानसात निर्माण झाल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका यांच्या कृतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मध्यंतरी राहुल गांधी यांनीही सौम्य हिंदुत्वाची कास धरत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो पूर्णपणे फसला. आता प्रियांका यांची ही सक्रियता कॉंग्रेसमधील बदलाचे संकेत देणारी ठरते आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.