नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या भूमिकेने भाजप सुखावला आहे. संपूर्ण देश किशोर यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
भाजप अनेक दशके भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, असे भाष्य किशोर यांनी केले.
एवढेच नव्हे तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भ्रमात राहू नये, असा इशारेवजा सल्लाही त्यांनी दिला. त्यावर भाजपचे प्रवक्ते राज्यवर्धनसिंह राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. देशाला माहीत असलेल्या वस्तुस्थितीविषयीच किशोर बोलले आहेत. मात्र, राहुल यांचे मत वेगळे असेल.
त्यांनी कधीच देशाचा आवाज ऐकलेला नाही. मोदी सरकार तळागाळातील घटकांशी जोडले गेले आहे. त्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सरकारची धोरणे ठरतात. त्यामुळे राजकारणाविषयी आता युवकांचा दृष्टीकोन सकारात्मक बनला आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांची प्रतिक्रिया पाहता किशोर यांनी केलेले भाष्य भाजपला सुखावणारे असल्याचे सूचित होत आहे.