जम्मू – सरत्या वर्षात पाकिस्तानी आगळिकींनी कहर केला. पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत भारतीय हद्दीत तब्बल 5 हजार 100 वेळा मारा केला. तो 18 वर्षांतील नापाक उच्चांक ठरला.
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत 2003 मध्ये करार (शस्त्रसंधी) झाला. मात्र, पाकिस्तानी कुरापतींमुळे तो करार एकप्रकारे 2020 या वर्षात मोडीत निघाला. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या माऱ्याची सरासरी दिवसाला 14 इतकी होते.
त्या माऱ्यात 36 जण मृत्युमुखी पडले, तर 130 जण जखमी झाले. मृतांमध्ये 24 शहीद जवानांचा समावेश आहे. सीमेवरील शांतता बिघडवण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमा नाक्यांबरोबरच निवासी भागांनाही लक्ष्य केले. त्यामागे भारतीय रहिवाशांमध्ये घबराट निर्माण करण्याचाही हेतू होता.
पाकिस्तानी सैनिकांनी मागील वर्षी (2019) 3 हजार 289 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यातील निम्म्या आगळिकी अवघ्या पाच महिन्यांत घडल्या. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल करण्याच्या भारताच्या धडक पाऊलामुळे पाकिस्तान बिथरल्याचे स्पष्ट झाले. ते पाऊल भारताने मागील वर्षी ऑगस्टमध्ये उचलले.
पाकिस्तानी सैनिकांनी 2018 मध्ये 2 हजार 936 वेळा भारतीय हद्दीत मारा केला. तशाप्रकारच्या 971 घटना 2017 मध्ये घडल्या. त्या वर्षापेक्षा शस्त्रसंधी भंगाच्या पाच पट अधिक घटना सरत्या वर्षात घडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
शस्त्रसंधी होण्याच्या आदल्या वर्षी (2002) पाकिस्तानी सैनिकांनी अक्षरश: थैमान घालत 8 हजार 376 वेळा भारतीय हद्दीत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. दोन्ही देशांत करार झाल्यानंतर 2004, 2005 आणि 2006 या तीन वर्षांत पाकिस्तानने एकदाही शस्त्रसंधीचा भंग केला नाही. मात्र, 2009 पासून पुन्हा पाकिस्तानी आगळिकी वाढत गेल्या.
2014 यावर्षी 583 तर 2015 मध्ये 405 पाकिस्तानी कुरापतींची नोंद झाली. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा 3 हजार 323 किलोमीटर लांबीची आहे. त्यातील जम्मू-काश्मीरमधील एलओसी 740 किलोमीटर, तर आंतरराष्ट्रीय सीमा 221 किलोमीटर इतकी आहे.
शस्त्रसंधी भंगामुळे रहिवाशांना यातना
पाकिस्तानी शस्त्रसंधी भंगामुळे सीमाभागात राहणाऱ्या भारतीय रहिवाशांना अनेक यातनांना सामोरे जावे लागते. पाकिस्तानी माऱ्यात अनेकदा सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागतो. सरत्या वर्षात जीव वाचवण्यासाठी रहिवाशांना तीनवेळा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी जावे लागले.
त्यामुळे शेतीबरोबरच शिक्षणासारख्या दैनंदिन कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. पाकिस्तानी माऱ्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी भारताकडून 14 हजार 400 जमिनीखालील बंकर्स उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.