ओतूर – माळशेज घाट सध्या पर्यटनासाठी बंद आहे. त्यामुळे ‘अहमदनगर-कल्याण’ महामार्गापासून आणि ओतूरपासून सुमारे पाच ते सहा कि.मी.अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मुंजोबा डोंगराच्या धुरनळी धबधब्याची आता या पर्यटकांना भुरळ पडलीय.
निसर्गाचा अविष्कार असणारा हा धबधवा वसंत ऋतूला सुरुवात झाली की एका वेगळ्याच रुपात वाहु लागतो. मुंजोबा डोंगरावर निम्मे चढण चढल्यावर काही अंतरावर एका कपारीत मुंजोबा तसेच शिवमंदिर आहे. येथे दर्शनलाभ घेणारे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. या डोंगराच्या कुशीतून हिरव्यागार वनराई व हिरवळीतून धबधब्याचे खळखळणारे पाणी आपला सौंदर्यपुर्ण मार्ग काढीत वाहते. उंच कड्यावरुन धबधबा कोसळत असताना वादळी हवेने त्याचे तुषार जणु दुरुन आगीच्या धुरासारखे भासवतात.
नळीतून वाहनारा हा धबधबा लांबून बघताना धुरासारखा दिसत असल्याने त्याला ‘धुरनळी’संबोधले आहे. जवळपासचे निसर्गप्रेमी, युवक,युवती,कॉलेज कुमार अनेक वर्षापासून पर्यटन करण्यासाठी आषाढ महिन्यात येथे गर्दी करतात. मात्र या वर्षी येथे पर्यटनासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्या वाढलीय. आपल्या नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळांमुळे वैभवशाली असणारा जुन्नर तालुका पर्यटन तालुका झालेला आहे. तालुक्याच्या पर्यटनास वाव मिळण्यासाठी अशी दुर्लक्षित मात्र नैसर्गिक दृष्ट्या अविष्कार ठरलेली स्थळे (पॉईंट) पर्यटनाच्या दृष्टींने विकसीत व्हायला पाहिजेत, अशा अपेक्षा येथील पर्यटनप्रेमी व निसर्गप्रेमींची आहे.